रपति, गडपति, सामर्थ्यवान व पुण्यवान असा गौरव केला जातो तो शिवछत्रपतींचा. त्यांचा मते किल्ले, दुर्ग हे राज्याचे सार होय. त्यावेळी त्यांच्याकडे ३५० किल्ले होते व हेच शिवशाहीचे मर्म होते. आजही हे गड, किल्ले उन, वारा, पाऊस यांच्याशी झुंज देत असुन आपल्याला इतिहासाची साक्ष देतात.
     याच किल्यांपैकी एक म्हणजे पेब किल्ला. त्याची खरी ओळख करुन दिली ती स्वामी सखा यांनी. पनवेलच्या इशान्येला नेरळ गावापासुन ४ किमी अंतरावर दक्षिणेला सुमारे २२०९ फुट उंच असलेला हा किल्ला म्हणजे हुबेहुब गिरनार (जुनागड, गुजरात) पर्वताची प्रतिकृती होय. सन १९७९ साली झालेल्या दृष्टांतानुसार स्वामी सखांनी या गडाचा विकास केला. पुर्वी गडावर जाण्याची वाट अतिशय बिकट व रुंद होती.
     अशी दंतकथा सांगतात कि रावणाने लंकेकडे शिवलिंग नेले तो हाच मार्ग होय. त्याची पुर्तता करण्यासाठी गणपतीने सहावा अवतार घेतला त्याचे नाव विकट. तो येथुन जात असतांना जेथे उंदराच्या नाकातील वेसन तुटले तो नाखीन किल्ला. शेजारी चंद्र हसला म्हणुन चंदेरी ही पर्वतरांग. गणपती पडला त्या किल्याचे नाव गाडेश्वर. त्याच्या हातातला मोदक पडला ती मोदक टेकडी व समोर माथेरान या सगळ्यांनी वेढला असल्यामुळे याला टेहेळणीसाठी निवडला. उंच कडा व दरी यामुळे चढण्यास अवघड असल्याने याचे नाव विकटगड असे पडले.
     विकटगड चढतांना अर्ध्यावरच आपल्याला महादेवाचे मंदिर लागते. जवळच दोन गुहा आहेत. स्वामी सखांनी आजपर्यंत सतत कधी एकटे, कधी भक्तांबरोबर जाऊन मंदिर व गुहा स्वच्छ केल्या व त्याची रंग रंगोटी केली. स्वामी समर्थांची आकृती दग़डावर खोदुन रंगविली व स्वामींच्या पादुका स्थापन केल्या. महादेवाच्या देवळाचे जोते साफ करुन पिंडीची पुनर्स्थापना केली. पुढे वर चढतांना रस्ता नसल्याने स्वामी सखांनी पाय-या तयार केल्या. तेथुन वर गेल्यावर अमृतानंद सिद्धेश्वरांची ४५० वर्षे जुनी समाधी आहे. तेथुन थोड्याच अंतरावर असलेली पाण्याची टाकी व महादेवाच्या मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम स्वामी सखा यांनी पूर्ण केले. या मंदिराचा उल्लेख गुरुचरित्राच्या सहाव्या अध्यायात सापडतो. आता येथे कायम स्वरुपी उपासक असुन स्वामी सखा देखील अधुन मधुन तसेच होळी व महाशिवरात्रीस गडावर जात असतात.
     १९७९ सालापासुन चाललेला हा प्रवास व त्याची परिणीती प्रति गिरनार निर्माण करण्यात झाली. ३ सप्टेंबर २००४ रोजी श्री दत्तात्रेयांच्या पादुकांची विधीवत स्थापना करण्यात आली. गिरनार हे प्राचीन काळापासुन प्रसिद्ध व जागृत देवस्थान आहे. दत्तगुरु जेथे अंतर्धान पावले तो गिरनार पर्वत होय. येथे दत्तप्रभुंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी १०,००० पाय-या चढाव्या लागतात. त्याचप्रमाणे सुमारे २२०९ फुट उंच असणा-या विकटगडाच्या अतिशय चिंचोळ्या शिखरावर प्रति गिरनारची स्थापना करण्यात आली आहे.
स्वामी सखांनी सांगितल्याप्रमाणे विकटगड हा पर्वत उत्तर - दक्षिण असल्याने सर्व संकटातुन तरुन जाईल. तसेच हा पर्वत अग्निजन्य असल्याने याला भुकंपाचा कधीच उपद्रव होणार नाही. त्यामुळे येथील दगडात खोदकाम करणे अशक्य आहे. म्हणुन बौद्धकालीन भिक्षुंनी येथे काम करणे सोडुन दिले, त्यामुळे अर्धवट राहिलेल्या गुहांचा उपयोग स्वामी सखांनी एकांत, ध्यानधारणा करण्यासाठी केला. स्वामी सखांनी दोन तपांचा कालावधी येथे घालविला आहे.