देवीचे स्वयंभू जागृत स्थान असून श्री स्वामी सखांना पहाटे साडे तीन ते चार च्या दरम्यान स्वप्न दृष्टांत देवून माझे येथे दिड हात खोल मुख कमल आहे व दर शुक्रवारीच पूजाअर्चा व दर्शन घ्यावे असे भगवतीने सांगितले. त्याच्याच बाजुला श्री विष्णुचे पद व बुद्धाचे स्थान आहे. या ठिकाणी ज्या स्वामी भक्तांना आपली कुलदैवत माहित नसते ते येथे येवुन जगदंबेची ओटी भरून कुलदेवतेला प्रसन्न करतात. येथील दुर्गेच्या प्रतिमेची स्थापना श्री डॉ. हेमंत जगताप यांच्या हस्ते झाली. नित्य कर्मासाठी गायत्रीची स्थापना करण्याचा विचार झाला. गायत्रीची उपासना सुर्याला साक्षी ठेवुन करायची असते म्हणुन सुर्य मंदिर व रेणुका देवीच्या मंदिरा समोर स्थापना करण्यात आली. तीन फुट खोलीच्या आकाराचा हौद तयार करुन या मध्ये स्वामी भक्तांसाठी गायत्री जपाच्या पुनर्श्चरणासाठी सोय करण्यात आली आहे. त्यातच कमळाच्या फुलावर पंचमुखी गायत्रीची स्थापना केली आहे. गायत्री मंत्राच्या जपाने स्मरणशक्ती जागृत होत असते. अशा प्रकारे येणारे स्वामी भक्त येथे आपली सेवा रूजु करुन तेथील आनंद घेत असतात.